युवापिढी अमली पदार्थांच्या जाळ्यात; प्रशासनाकडून गंभीर दाखल
प्रसाद रानडे,रत्नागिरी
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात गांजा ब्राऊन शुगर आदी तत्सम अमली पदार्थांच्या विक्री व साठयाविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या प्रशासनाने कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. युवा पिढी या अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकण्याची अनेक उदाहरणे आहेत. आता ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय या ठिकाणी जाऊनही ही अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी ही प्रशासनाला आज रत्नागिरी येथील बैठकीत सूचना केल्या आहेत.
जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात जिल्हा पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी ही मोहीम पुन्हा एकदा तीव्र केली आहे. युवा पिढीमध्ये वाढलेलं व्यसनाधीनतेचे प्रमाण रोखण्यासाठी ही कारवाई कडक करण्यात आली आहे. यासाठी आता अमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम शाळा महाविद्यालयांमधून केली जाणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व विभागांनी अंमली पदार्थांच्या उच्चाटनासाठी सतर्क रहावे. शिक्षण विभाग आणि समाज कल्याण विभागाने शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षक, पालक यांची बैठक घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी कार्यक्रम घ्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनीही दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गुरुवारी बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्यासह प्रांताधिकारी, तहसिलदार उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी विषय वाचन करुन मागील बैठकीचा वृत्तांत सांगितला. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, तडीपारची प्रकरणे ज्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत, त्यांनी ती मार्गी लावावीत. जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ कुठून येतात त्याबाबत सतर्क राहून त्याची माहिती घेऊन संपूर्णपणे विचारून करावे अशा सूचना त्यांनी केले आहेत.
