दापोली प्रतिनिधी
बहुतेकांच्या आवडीचा थर्टी फर्स्ट अर्थात ३१ डिसेंबर एका दिवसावर येऊन ठेपला आहे. हा क्षण साजरा करण्यासाठी अनेकजण आधीपासूनच नियोजन करतात. अनेकजण पर्यटनस्थळे, टेकडी, जंगल परिसर वा निर्जनस्थळी जाऊन दिवसभर मौजमजा करतात; पण सरत्या वर्षाला निरोप देताना मद्याच्या अंमलाखाली वा उत्साहाच्या भरात पर्यावरणाचे नुकसानही करतात. हा प्रकार टाळण्यासाठी सर्वांनी पर्यावरणाचे भान ठेवूनच ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करावा, असे आवाहन वाईल्ड ऍनिमल रेस्क्यूअर (रजी.) संघटनेंने केले आहे.
हॉटेल, रिसॉर्ट, क्लब, पब , डिस्कोथेक अशा ठिकाणी ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. पण, सर्वांनाच ते शक्य होत नाही. बहुतेकजण मोकळ्या आकाशाखाली नववर्षाचे स्वागत करण्यास प्राधान्य देतात. शेत, मोकळे रान, जलस्रोतांचे ठिकाण, जंगलालगतची जागा, रस्त्याकडेचे ठिकाण अशा ठिकाणी साग्र संगीत वनभोजनाचा आनंद लुटला जातो. अनेकजण दुपारपासूनच इच्छितस्थळी जाऊन तयारीला लागतात. काही लोक दूरवरच्या ठिकाणी एक सहल आयोजित करून तिथेच दिवस व रात्रही घालवतात.
वनभोजन म्हटले की रानावनात चूल
पेटवावी लागते. रात्रीपर्यंत राहायचे असेल तर शेकोटीही ओघाने येतेच. मौजमजा करताना अनेकांना भान राहत नाही. चूल वा शेकोटीतील ज्वाळा वा इतस्तता टाकलेले सिगारेटचे थोटूक अनर्थ घडवू शकते, याची कुणाला कल्पनाही नसते. कारण, ही ठिणगी
जंगल वा अख्खे माळरान पेटवायला
कारणीभूत ठरू शकते. पश्चिम घाटात असे प्रकार अनेकदा घडले आहेत. त्यामुळे, वनभोजनासाठी चूल वा तलफ भागविण्यासाठी सिगारेट पेटविण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘थर्टी फर्स्ट’च्या नावाखाली मोठमोठ्या आवाजात गाणी लावून जंगल परिसरात घातला जाणारा गोंधळ. अशा प्रकारामुळे पशुपक्षी व वन्यप्राण्यांच्या दिनचर्येत व्यत्यय येतो. त्यातील काही हिंस्र प्राणी बिथरुही शकतात. तसेच बहुतेकजण पार्टी संपल्यानंतर मद्य, सोडा व पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा, प्लेटस् व अन्य साहित्य तिथेच टाकून येतात. त्यामुळे, पर्यावरणाचे नुकसान होते.
जंगलांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या क्षणिक आनंदासाठी बहुमूल्य असलेल्या पर्यावरणाला धोक्यात आणणे चुकीचे आहे. दरवर्षी रोपलागवड करुन आपण जंगल तयार करु शकत नाही. पण, शिल्लक जंगलाची जपणूक करून वर्तमान समृद्ध करणे एवढेच आपल्या हातात आहे.
दरवर्षी १ जानेवारी रोजी ठिकठिकाणी असे प्रकार पाहायला मिळतात. अर्थात सर्वचजण असे करतात असेही नाही. काहीजण पर्यावरणाचे भान राखून आनंद साजरा करतात. आता प्रत्येकाने त्यांचे भान राखले पाहिजे.
असे प्रकार राखीव वनक्षेत्रात निदर्शनास आल्यास वनविभागा मार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल
अध्यक्ष :- मिलिंद मारुती गोरीवले
वाईल्ड ऍनिमल रेस्क्यूअर (रजी.)
